spot_img
spot_img
spot_img

भूकंप पुनर्वसित गावात वनीकरणाची कामे हाती घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याचे नियोजन करा उपसभापती प्रा.डॉ.नीलम गोऱ्हे विविध विषयांचा घेतला आढावा

 

धाराशिव प्रतिनिधी : दि.३ एप्रिल भूकंपाने बाधित झालेल्या उमरगा व लोहारा तालुक्यातील पुनर्वसन करण्यात आलेल्या ३८ गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात वनीकरणाचे कामे हाती घ्यावीत व जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांना उन्हाळ्याच्या दिवसात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे.असे निर्देश विधानपरिषद उपसभापती प्रा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागात सामाजिक वनीकरण करणे,जिल्ह्यात टंचाईच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे,जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि अमली पदार्थ विरोधी कार्यक्रम व ऊसतोड महिला कामगार योजनांचा आढावा घेताना डॉ.श्रीमती गोऱ्हे बोलत होत्या.

यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की,ज्या ३८ भूकंप बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्या गावांमध्ये स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी.या गावांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वने तयार करावी.ज्या ९० हेक्टरवर वनीकरणाची कामे पूर्ण झाली,उर्वरित जमीनीवर देखील वनीकरणाची कामे हाती घ्यावीत.ज्या गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे त्या गावांमध्ये सुविधा निर्माण झालेल्या आहेत का ते बघावे.या गावांमध्ये स्मृतिवन तयार करण्याचे नियोजन करावे.यामध्ये ग्रामस्थांना वनीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे त्या यावेळी म्हणाल्या.

जिल्ह्यातील ज्या १०३ गावांमध्ये मागील वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला, त्या गावांमध्ये यावर्षी पाणीटंचाईची स्थिती निर्माण होत असेल तर त्या गावांपर्यंत यंत्रणांनी पोहोचून टंचाई परिस्थितीची माहिती घ्यावी असे सांगून प्रा.डॉ.गोरे म्हणाल्या की, या गावाच्या ग्रामस्थांनी पाणीटंचाई उपायोजनाबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.शहरी भागातील ज्या विहिरीच्या पाण्याचा उपयोग करण्यात येत नाही, त्या विहिरीचे खोलीकरण करून गाळ काढून पाण्याचा उपसा करून त्या विहिरी स्वच्छ करून पाण्याचे निर्जंतुकीकरण करून त्या विहिरींचे पाणी पिण्यासाठी उपयोगात आणण्याचे नियोजन करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील पशुधनाला चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चारा लागवडीचे नियोजन करण्यात यावे असे सांगून डॉ. श्रीमती गोऱ्हे म्हणाला की,या उन्हाळ्यात चारा टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी.जिल्ह्यातील महिलांचे आत्महत्यांचे प्रमाण शून्यवर आले पाहिजे,त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना द्यावी.त्यांचे समुपदेशन करण्यात यावे.तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम प्रशासनाने करावे.जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याबाबत यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे.समुपदेशन तसेच महिलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करावे.असे प्रा डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

जिल्ह्यात विविध शाळा व महाविद्यालय तसेच अन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नशा व अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम चांगली राहील,यासाठी सर्व प्रकारचे सण व उत्सव सर्वांना सोबत घेऊन साजरे करावे.रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिलांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कामाच्या ठिकाणी शेडची व्यवस्था करण्यात यावी.असे निर्देश प्रा.डॉ.श्रीमती गोऱ्हे यांनी दिले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री.जाधव म्हणाले की,अमली पदार्थ विरोधी कार्यक्रमातून लोकांना त्याचे दुष्परिणाम आणि गुन्हेगार म्हणून त्यामध्ये सापडले तर कोणती शिक्षा होते,याची जाणीव करून देण्यात येईल तसेच हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी एक सेल तयार करण्यात आला असून त्या मागची कारणे शोधून हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.भूकंपाने बाधित पुनर्वसित गावात स्मृतीवन तयार करण्यात येऊन तेथील ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करून प्रशासन त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करेल असे श्री.यादव यांनी सांगितले.

 

ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी नियमित करण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. अरवत यांनी दिली.गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. पुजारी यांनी दिली.जिल्ह्यात मागील वर्षी १७ बालविवाह रोखण्यात आल्याचे श्री.गोरे यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाईबाबत गावांकडून प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याचे श्री.सरवदे यांनी सांगितले. जिल्ह्यात भूकंप बाधित ज्यांचे पुनर्वसन झालेले आहे असे अ वर्गवारीचे उमरगा तालुक्यातील १० आणि ब वर्गवारीची १६ अशी २६ आणि लोहारा तालुक्यातील अ वर्गवारीची ९ आणि ब वर्गवारीची ३ अशी एकूण १२ गावे तर दोन्ही तालुका मिळून ३८ गावे असल्याची माहिती जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी दिली.

या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे, विभागीय वन अधिकारी श्री.पोळ व श्री.करे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले,सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री.गोरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या