धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे…
धाराशिव,17 एप्रिल जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा २) अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना खरीप हंगामासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी आंबा व द्राक्ष निर्यातीस प्रोत्साहन देण्याबरोबरच साठवणूक क्षमतेत वाढ करण्यासाठी पॅक हाऊस व गोडाऊन योजनांचा प्रभावी उपयोग होण्यावर भर दिला.शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.सन २०२४-२५ मध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत आंबा फळपिकांची अपेडा प्रणालीवर मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्याचे नमूद करून,तसेच MREGS योजनेतून फळबाग लागवडीत झालेल्या वाढीबद्दल त्यांनी कृषि विभागाचे विशेष कौतुक केले.
प्रशिक्षण सत्रात कृषि विद्यावेत्ता श्री. गुट्टे सर यांनी सोयाबीन लागवड, व्यवस्थापन आणि काढणीपर्यंतची तांत्रिक माहिती सविस्तरपणे मांडली. यासोबतच, पाणलोट संकल्पनेविषयीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रकल्प तज्ज्ञ श्री. प्रशांत सिरस यांनी पाणलोट क्षेत्रातील विविध उपचार, स्थळनिश्चिती आणि योजनांची अंमलबजावणी यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगामी खरीप हंगामात फळबाग लागवड,जलसंधारण,मृद संरक्षण व इतर कृषि मोहिमा प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. त्यांनी विभागीय समन्वय साधून शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वच स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात आले