धाराशिव, 27 मे 2025: जिल्हा परिषद जलसंधारण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अद्याप कारवाई न झाल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कार्यकारी अभियंता श्री. चंद्रसेन राऊळ यांनी 2020 ते 2025 या कालावधीत विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता बोगस मासिक दौऱ्याची लाखो रुपयांची बिले जि प धाराशिव यांच्याकडे सादर केली. नाला खोलीकरण, पाझर तलाव दुरुस्ती, सिमेंट व कोल्हापुरी बंधारे अशा विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची जबाबदारी असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यपालन न करता ठेकेदारांशी संगनमत करून सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात मोबाईल लोकेशन, जिओटॅगिंग फोटोज, दौरा रजिस्टर व लॉग बुकच्या आधारे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, संबंधित कामे प्रत्यक्षात झालेली आहेत का, त्यांचा दर्जा काय आहे, याची पडताळणीही करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
तक्रार दिल्यानंतरही चौकशीस विलंब झाल्यामुळे अखेर पक्षाच्या वतीने आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांनी कार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनाची प्रत, पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना देखील सादर करण्यात आली आहे. आता या आंदोलनाला जिल्हा प्रशासन कशा प्रकारे प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.