पुणे जिल्हा प्रतिनिधी ( अजिंक्य मस्के)
ज्ञानाचे प्रतीक मानले जाणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि गौतम बुद्ध आहेत. दोघांनीही मानव कल्याणाचा संदेश दिला आहे. त्याच मार्गावरून जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाटचाल करत गोरगरिबांच्या कल्याणासाठी कष्ट सोसले. महामाता रमाई यांनीही त्यांना आयुष्यभर साथ दिली. महामाता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन त्याग आणि समर्पणाचे द्योतक असल्याच्या भावना एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केल्या.
महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात शुक्रवारी (दि. ७) एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड आणि तिमल नहगम यांना ‘रमाईरत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. कराड बोलत होते. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, महेश टच थोरवे, अॅड. अविनाश साळवे, प्रा. रतनलाल सोनखा, देवेंद्र कांबळे उपस्थित होते. डॉ. कराड म्हणाले, डॉ. आंबेडकर आणि महामाता रमाई यांचे कार्य मानवताधर्मी आहे.