नंदगाव (शाम नागिले ) – बिहार राज्यातील बुद्धगया जिल्ह्यातील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी दि.५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या बाबत सविस्तर असे की,जिल्हाधिकारी साहेब यांना आज दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, बुद्धगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्यात यावा, बुद्धगया महाबोधी विहार व्यवस्थापन बौद्ध समुहाकडे सोपविण्यात यावे, बौद्ध धार्मिक व्यवहारात राज्य हस्तक्षेप थांबविण्यात यावा या मागणीसाठी महाबोधी विहार येथे सर्व बौद्ध भिक्खू व भंतेजी यांनी दि.12 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून काल पोलिस विभागाने त्या आंदोलन करणाऱ्या भिक्खू यांना रात्री तेथून तात्पुरती अटक करून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.या घटनेचा निषेध व महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी दि.५ मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल व सर्व फुले,शाहू, आंबेडकर विचाराचे पक्ष व संघटना यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा चे विजय बनसोडे, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव सचिन दिलपाक, धनंजय वाघमारे साहेब यांच्या सह्या आहेत.